माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे

10.10.08

मनामध्ये

केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये,
आपुलकीच्या नात्यांमधुनी स्नेह जपावा मनामध्ये ॥१॥

येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखांत वाणी गोड हवी,
जाणाऱ्याच्या मनांत फिरूनी येण्याविषयी ओढ हवी. ॥२॥

ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वहावा मनामध्ये,
भांड्याला लागते भांडे, विसरूनी जांवे क्षणांमध्ये. ॥३॥

परस्परांना समजुनी घ्यावे, अढी नसावी मनामध्ये,
रुसवे-फुगवे नको फुकाचे, मोद रहावा घरामध्ये. ॥४॥

नित्य काळजी घरात घ्यावी-वय झालेल्या पानांची,
ज्याला त्याला द्यावी जागा, वया प्रमाणे मानाची. ॥५॥

एकमताने निर्णय घ्यावा- नको दुरावा मनामध्ये,
एक तीळ ही सात जणांनी वाटून घ्यावा घरामध्ये ॥६॥

नको घराला गर्व धनाचा- लिन रहावे प्रभुचरणी,
लळा जिव्हाळा आंत असावा नको उमाळा वरकरणी. ॥७॥

दिवसा रात्री परमेशाचा वास असावा घरामध्ये,
आपुलकीच्या नात्यांमधुनी स्नेह जपावा मना मध्ये ॥८॥

कवयत्री : विमल लिमये.

7.10.08

हरवलेलं राष्ट्रप्रेम

देशदूत पेपरातील "हरवलेलं राष्ट्रप्रेम" हा लेख मी वाचायला घेतला आणि मला तो इतका आवडला की मी त्याला माझ्या ब्लॉगवर समाविष्ट करण्याचे निश्चित केले. त्याची लिंक माझ्याकडे नसल्याने तो लेख मी जसाच्या तसा सर्वांसाठी सादर करत आहे. कारण अशा विचारांची देशाला फ़ारच गरज निर्माण झालेली आहे.

शिक्षण घेतांना नेहमी ऎकिवात यायचं, ’देशासाठी जगायला पाहिजे’ मात्र असं जीवन जगणारे फ़ारच थोडे. आणि तेही ऎकलेले किंवा वाचलेले. एवढी निस्सीम राष्ट्रनिष्ठा या धावपळीच्या युगात प्रत्यक्ष बघायला वा अनुभवायला मिळाली नाही. प्रत्येकाला वाटतं शहीद भगतसिंग जन्माला यावेत पण आअपल्या घरात नाही शेजारच्या घरात. चंगळवाद, वाढती स्पर्धा, पैसा हे अंतिम साध्य, भपकेबाज प्रगती यात आपण गुरफ़टत चाललोय. सर्वांचेच असे ध्येय असतील तर देशासाठी विचार करणार कोण?

अशा प्रकारे मी विचार करू लागलो याला कारणीभूत ठरली एक व्यक्ती. ’अनिवासी भारतीय’ एखाद्या अनिवासी भारतीयाने (एनआरआय) एका अस्सल भारतीय (ह.मु.भारत, खंड - आशिया) माणसाच्या मनात राष्ट्रभावना जागृत केली. या व्यक्तीने दीड तास जे भाषण दिले त्यात ते भावना अनावर होत रडू लागले. रडत असतांना ते एक वाक्य बोलले व सभागृहातल्या ताठ माना शरमेने खाली झाल्या. ते म्हटले, मला माझ्या भारताची काळजी वाटते. ती व्यक्ती सुप्रसिध्द हॉटेल व्यावसायिक श्री. बाळासाहेब देशमुख (जपान).

बाळासाहेब देशमुख (मूळ उस्मानाबाद जिल्हा) सन १९७१ मध्ये अगदी कफ़ल्लक विचाराने जगत असतांना ’जपान देश कसा असेल?’ या कुतुहलापोटी जपान जायचे स्वप्न बघतात. हातात ना मोठी पदवी नाही पैसा. अशा परिस्थितीत ते स्वप्न बघतात व साकार करतात. प्रारंभी जपान जाण्यासाठी कष्ट, जपानमध्ये भांडी धुणे, फ़ुलं विकणे, शौचालय साफ़ करणे, उपाशी राहणे, धर्मांतराची प्रलोभने दाखवणे अशा अनेक्विध दिव्य पार पाडून यशस्वी उद्योजक बनणे हा प्रवास थक्क करतो. याला कारण ’ते ज्या लोकांमध्ये राहिलेत ती जापानी वृत्ती’ जापान....हिरोशिमा, नागासाकी...जागतिक महायुध्दात बेचिराख झालेला देश. १९४५ साली जापान नेस्तनाबुत झाला. एक नवीन पर्व १९४५ नंतर जापानमध्ये सुरू झाले. प्रत्येक जापानी फ़क्त देशासाठी जगू लागला. सर्वांचे एकच ध्येय ’जापान महासत्ता होणार’ एक स्वप्न आणि करोडो हात आणि फ़क्त राष्ट्रप्रेम याचा परिणाम जापान काही दशकात एक विकसित राष्ट्र म्हणून नावारूपाला आला.

सोबत १५ ऑगस्ट १९४७ भारत स्वतंत्र झाला. भारतातही एक नवं पर्व सुरू झालं. जवाहरलालजी, गांधीजी, तत्कालीन मोठ्या विभुतींनी भारतीयांना जगण्याचे मंत्र दिले. कर्मपुजा, सामाजिक समानता, सर्वात मोठी लोकशाही, भारतीय संविधान तत्सम महान तत्व भारतीय मातीत रूजत होती. समाजसुधारणा, स्त्रीशिक्षण, अनिष्ठ प्रथाबंदी वाटचाल सुरू झाली. विज्ञान-तंत्रज्ञान-संरक्षण, अवकाश विज्ञान क्षेत्रात भारत पुढे जात होता. तरीही आज भारत विकसनशिल राष्ट्र का? १०० करोडहून मोठ्या लोकसंख्येचा देश असुनही विकसनशिल का? मात्र जापान....काळोखातलं राष्ट्र...विकसित का? या सर्वांना कारण निस्सीम राष्ट्रभक्ती! जापानी माणसाला कुठल्याही कामाची शरम नाही. कामाला वेळेचं बंधन नाही. ना चालीरिती, ना परंपरा, नाही कर्मकांड, नाही अंधश्रध्दा. एकच तत्व ’कर्म म्हणजे मंदिर, माणुस म्हणजे देव’. जापानी दाम्पत्य वडील स्वर्गवासी झाल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी ’ऒव्हरटाईम’ करतात. कारण तीच वडीलांना श्रध्दांजली असते. मात्र कर्माशी तडजोड नाही. यामुळेच जापानने राखेतुन फ़िनिक्स भरारी घेतली. समकालीन उदय झालेल्या तुमच्या आमच्या भारताचे काय? तर विलासी वृत्ती, स्वार्थी दृष्टीकोण. आजही भारतात चतुर्थ श्रेणी कर्मचारी होण्याची लाज वाटते. शासकीय कार्यालयातला सावळा गोंधळ, तर उद्योगधंद्यात कर्मचाऱ्यांची अकुशलता, कामचुकार वृत्ती. सामान्य माणसांच आयुष्य भोगवस्तु मिळविण्यात संपतं. तर श्रीमंतांचं आयुष्य वस्तुंचा भोग घेण्यात संपणार असतं.

वयाच्या २८ ते ३० वर्षांपर्यंत तरूणांना आई वडील खाऊ घालतात व त्यातचं समाधान मानतात. म्हणे भारत तरूणांचा देश आहे. ते तरूण जे स्वार्थी, लोभी राजकारण्य़ांच्या प्रचारफ़ेरीत निरर्थक ऒरडतात, तेच दर शुक्रवारी कोणती फ़िल्म रिलीज होणार याची वाट पाहतात. तरूणांच्या शक्तीचा वापर अशा रितीने होणार असेल तर कोणत्या तंत्रज्ञानाच्या बळावर भारत महासत्ता होणार? आज माता भगिनींना प्रत्येक चौकात वाईट नजरांना समोर जाव लागतं. किशॊरवयीन मुलींना आत्महत्या कराव्या लागतात व नाजुक हातपाय निरागस चेहऱ्याच्या बालकांना मजुर बनावं लागतं. अशा असंख्य समस्यांनाच आता विचारावसं वाटतं असं का?

जापान वय वर्ष ६३, भारत वय वर्ष ६१, यात साम्य. मात्र प्रगतीत एवढा फ़रक कशासाठी तर खालील बाबी भारतीय तरूणाईत रूजवाव्यात. एवढचं...विधायक राजकारणाला पाठींबा द्या. स्वत:ची शक्ती सत्कर्मासाठी खर्च करूया. पोस्टरछाप पुढाऱ्यांना वेळीच ऒळखू या. चांगल्या कामाची लाज बाळगू नका. अंधश्रध्दा, कर्मकांड, अनिष्ट प्रथा मुळासकट नाहीशा करू या. व्यसनांपासून दूर राहू या. "माझ्यासाठी देश नाही तर देशासाठी मी" यशासाठी अविरत झुंजत राहा. बॉलीवुड, टिव्ही, सिनेतारका यांपासून उत्तम गुण घ्या. भारतीय समाजाला बाधक गोष्टी वर्ज्य करा. राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्राभिमान उराशी बाळगा. प्रांतवाद, धर्मवाद, भाषावाद मनातुन, देशातुन हद्दपार करा. हे जर तरूणांनी केले तर निश्चितच सर्वांनी पाहिलेले स्वप्न लवकर पूर्ण होईल.

24.9.08

कामाचा ताण

सकाळी उठल्यापासून धावायला जी सुरूवात होते ती कधी संपतच नाही. डोळे उघडायच्या आतच कामं समोर येऊन उभी राहतात. कुठलाचं आनंद चवीने घेता येत नाही. संध्याकाळी फ़िरायला जाणं, गाणी ऎकणं, आवडीचं पुस्तक वाचणं, हे सगळं सोडाच परंतु जीव बिचारा कायम दमलेला, शिणलेला, कावलेला, कंटाळलेला...

का येतो हा कामाचा ताण? त्यामुळे आपली ऊर्जा का संपते?

  1. सतत फ़क्त कामाचाच विचार करणे
  2. एकाच प्रकारचं काम खूफ वेळ करत राहणे
  3. कामाच्या वेळा निश्चित नसणं
  4. स्वत:च्या छंदासाठी वेळ न मिळणं
  5. कामाचं सतत टेंशन असणं
  6. कामाच्या डेडलाईन्स खूप टाईट असणं

कामाच्या ताणाची लक्षणं

  1. कामात लक्ष लागत नाही. कॉन्सन्ट्रेशन होत नाही
  2. सतत थकवा जाणवतो
  3. कशातच काही अर्थ उरला नाही असं वाटणे
  4. कामाचं भयंकर टेंशन येतं
  5. निराश वाटायला लागतं
  6. चिडचिड होते
  7. झोप लागत नाही

यावरील काही उपाय -

  1. कामातून मधून मधून ब्रेक घ्या. सलग दोन दिवसांची का होईना पण सुटी घ्या
  2. स्वत:ला काय आवडतं त्या गोष्टी करण्यासाठी वेळ द्या
  3. रोज थोडा तरी व्यायाम करा
  4. आपल्याला न आवडणारं एखादं काम करावं लागत असेल तर ते बदलून घ्या
  5. कामाची टेंशन्स ऑफ़िसमध्येच ठेवायचा प्रयत्न करा
  6. घरच्यांबरोबर थोडा तरी वेळ काढा
  7. मग बघा तुमच्यावरील कामाचा ताण तुम्हाला कसा घाबरतो ते!

23.9.08

रोगांपासून रक्षण कसे करावे?

काही खाद्यपदार्थ व पेय शरीरास आवश्यक असतात. परंतु ते इतर खाद्यपदार्थांबरोबर मिसळल्यास विषासारखे काम करता हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

हितकारी संयोग -
  • खरबुजासोबत साखर खावी
  • आंब्यासोबत गाईचे दुध घ्यावे
  • केळीसोबत विलायची खावी
  • खजुरसोबत दुध घ्यावे
  • भातासोबत दही खावे
  • चिंचेसोबत गूळ खावा
  • पेरुसोबत सोप खावी
  • टरबुजासोबत गूळ खावा
  • मक्यासोबत ताक घ्यावे
  • मुळ्यासोबत मुळ्याची पाने खावी
  • दह्याचा रायता खावा
  • गाजर आणि मेथीची भाजी खावी
  • जुन्या तुपासोबत लिंबाचा रस घ्यावा
  • पुरी किंवा कचोरीसोबत गरम पाणी प्यावे
  • शेंगदाण्यांसोबत गाईचे दुध, मठ्ठा प्यावा

अहितकारी संयोग -

  • दुधासोबत दही, मीठ, चिंच, आंबट फ़ळ खाऊ नये
  • दह्यासोबत खीर, दुध, पनीर खाऊ नये
  • खिरीसोबत खिचडी, आंबट पदार्थ, सत्तु खाऊ नये
  • मधासोबत मुळा, गरम पदार्थ किंवा पाणी पिऊ नये
  • तुपासोबत समप्रमाणात मध खाऊ नये
  • चहासोबत काकडी, खिरा खाऊ नये
  • भातासोबत व्हिनेगार घेऊ नये

अजीर्ण झाल्यास उपाय -

अधिक खाल्ल्याने त्रास झाल्यास खालील उपाय करावेत

  • केळी आणि एक किंवा दोन छोटी विलायची
  • जांभूळ आणि दोन आंबे किंवा मीठ
  • पेरू आणि सोप
  • लिंबु आणि मीठ
  • उडदा़ची डाळ आणि गूळ
  • चिंच गुळ
  • वांगी सरसोचं तेल

20.9.08

स्ट्रेस डायरी

दैनंदिन जीवनातील तणाव ही आजच्या युगातील सर्वात मोठी समस्या आहे. तणावाचे परिणाम काय काय होतात हे सांगणेही कठीण आहे. शरीर व मन व्याधिग्रस्त करणारा हा तणाव कोणाला कोणत्या रूपात भेटेल हे सांगता येत नाही. अगदी स्वत:ला न समजताही आपण तणावात राहत असतो. आपण तणावात आहोत किंवा नाही, कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला तणाव येतो हे जाणून घेण्यासाठी स्ट्रेस डायरी ठेवणे हा एक उपाय आहे. स्ट्रेस डायरी म्हणजेच दैनंदिन घटनांची तपशीलवार नोंद करणे. कोणत्या घटनांमुळे आपल्याला तणाव आला, हे जाणून घेणे या डायरीमुळे शक्य होते. दररोज घडलेल्या महत्वाच्या प्रसंगांची डायरीत नोंद करा आणि आठवड्यातुन एकदा आढावा घ्या.

  • कोणत्या घटनेमुळे आपल्याला सर्वाधिक ताण आला आणि का?
  • तणाव होणारे घटक अंतर्गत की बाह्य?
  • तणाव येऊ नये याकरता काय करता?
  • त्यामुळे ताण कमी होईल असे वाटते का?

हे प्रश्न स्वत:ला विचारून तणवमुक्तीचा मार्ग स्वत: विकसित करा.

16.9.08

कुलाचार - कुलदैवत

हिंदु धर्म संस्कृतीत चार गोष्टी अतिशय महत्वाच्या मानल्या जातात. त्या म्हणजे कुलदेवता, कुलदैवत, इष्टदैवत आणि पितरांची सेवा.

१. कुलदेवता - कुलदोवता म्हणजे देवी. जिला आपण कुलदेवी म्हणतो. आपल्या वंशजांनी नित्य पूजेत जिला स्थान दिले जिच्यामुळे आपल्या कुळाचा, घराण्याचा उध्दार झाला अशा देवीला आपल्या वंशजांनी कुलदेवता मानले. म्हणून तेव्हापासून आपण लग्नात त्यांचा सन्मान करून पूजा करू लागलो. रोज तिची सेवा करतो.

संपूर्ण भारतातील देवीची मुख्य स्थाने -

१. काश्मिरची वैष्णवी

२. कोलकात्याची महाकाली

३. कन्याकुमारीची महासरस्वती

आपल्या महाराष्ट्रातील देवीची प्रमुख पीठे -

१. तुळजापूरची अंबा भवानी

२. माहुरची रेणुका देवी

३. कोल्हापुरची महालक्ष्मी



२. कुलदैवत - आपल्या वंशजांनी कुलदेवतेप्रमाणेच कुलदैवत मानले. कुलदैवत म्हणजे कुळाचा उध्दार करणारा देव. तो म्हणजे खंडोबा, जोतिबा, भैरवनाथ, महादेव, नृसिंह, अर्धनारी नटेश्वर इ. असून त्यांची सेवा घरातील कर्त्या पुरूषाने करावी.



३. इष्टदेवता - आपापल्या आवडीप्रमाणे उपासनेकरीता निवडलेला देव उदा. गणपती, विष्णु, दत्तप्रभू, श्रीकृष्ण, श्री स्वामी समर्थ वगैरे यांचे मंत्र, स्तोत्र जप करावेत.



४. पितरांची सेवा - मासिक श्राध्द, वर्ष श्राध्द, संक्रांत, अक्षयतृतीया, सर्वपित्री अमावास्या, धूलिवंदन, चैत्र प्रतिपदा, त्रिपिंडी इ. या गोष्टी हिंदु धर्मात फ़ार महत्वाच्या मानल्या जातात. या गोष्टी जरूर केल्या पाहिजेत. म्हणजे वैयक्तिक त्रास, घराला आलेली अवकळा दूर होऊन सुख, शांती मिळेल.

13.9.08

मुलाखतीला जाताना

मुलाखतीचे निमंत्रण हे तुमच्या भावी यशाची नांदी असते. विशिष्ट नोकरीसाठी लागणारी किमान पात्रता तुमच्याजवळ आहे याची ती पावती असते. तुम्हाला मुलाखतीला बोलावून तुमचा भावी मालक तुम्ही अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे काही गोष्टींचा सोक्षमोक्ष करून घेत असतो.

सामान्यत: मुलाखतीचे पत्र कमीत कमी एक आठवडा अगोदर येते. आपणास तयारीस पुरेसा वेळ मिळतो. ग्रामीण भागात पत्रे वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे मग ऎनवेळी पत्र मिळाले तरी ’कपडे चांगले नाहीत’ असे म्हणून चालत नाही. तर आपण जे कपडे नेहमी वापरतो तेच वापरावेत. परंतु ते नीट्नेट्के, स्वच्छ व धुतलेले असावेत. शक्यतो त्याला इस्तरी केलेली असावी. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात निश्चित फ़रक पडतो. अगदीच भडक, फ़ॅशनेबल कपडे घालू नयेत. आपण कोणत्या पदासाठी मुलाखतीस जात आहोत याचेही भान असायला हवे. भारी किंमतीचा पोशाख मुलाखतीसाठी प्रथमच वापरू नये. मुलींनी नवीकोरी साडीऎवजी नेहमीची पण स्वच्छ साडी किंवा पंजाबी ड्रेस घालावा.

शासकीय किंवा खाजगी नोकरीत काही अपेक्षित शैक्षणिक पात्रता गृहीत धरलेली असते. त्यामुळे त्यांची तोंडी मुलाखत घेण्यात येते जेणेकरून उमेदवाराची बोलण्याची, वागण्याची पध्दती, विषयाची माहिती, चालू घडामोडींचे ज्ञान, नवीन शिकण्याची आवड तपासण्यात येते. मुलाखतीत याला अनुसरून प्रश्न विचारण्यात येतात.

मुलाखतीसाठी प्रवेश करतांना प्रथम शुभचिंतन केले पाहिजे. मुलाखतीत सर्व प्रथम सोपे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न विचारुन तुमच्या मनातील ताण कमी व्हावा हाच उद्देश परिक्षकांचा असतो. आपल्या नैमित्तिक सवयी उदा. तोंडावर हात ठेऊन प्रश्नांची अस्पष्ट उत्तरे देणे, पाय हलविणे, मान डोलावणे, टेबलावर हात ठेवणे, या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.

प्रश्नांची उत्तरे देतांना भरभर बोलू नये. परिक्षक प्रश्न विचारत असतांना उतावळेपणाने त्याचे उत्तर देऊ नये. प्रश्नांची अचुक व खरी उत्तरे द्यावीत. कारण त्यावरूनच तुमच्या व्यक्तिमत्वाची ऒळख होते. बऱ्याच प्रसंगात उमेदवाराला त्याच्या कौटुंबिक परिस्थितीची माहिती विचारण्यात येते. अशा वेळी त्याने खरी माहिती सांगणे आवश्यक आहे. साधी देखील माहिती सांगता आली नाही तर उमेदवाराने चेहऱ्यावर नाराजीची किंवा चुकलेपणाची भावना न दाखवता नम्रपणे "माहिती नाही" असे सांगावे. विनाकारण डोक्याला हात लावून विचार करत बसू नये.

मुलाखतीत विचारात घेतल्या जाणाऱ्या गोष्टी -
१. व्यक्तिमत्व - तुमचा पोशाख, वागण्याची पध्दत, आवाज, बोलण्याची पध्दत व वेग, मनोधैर्य, आत्मविश्वास

२. कौटुंबिक पार्श्वभूमी - तुमचे वडील, काका, मामा इ. च्या नोकऱ्या व त्यातील स्थान, त्यांचे समाजातील वजन, संदर्भ असलेल्या व्यक्ती

३. शिक्षण - शाळा, कॉलेज, त्यातील गुण, टक्केवारी, शिक्षण घेत असतांना खेळ, नाटके व अन्य उपक्रमातील सहभाग, यश व जबाबदाऱ्या

४. शिक्षणोत्तर अभ्यास - नोकरी व अनुभव इ. बाबत माहिती

५. आवडिनिवडी - वाचन, संगीत, चित्रकला, प्रवास, नृत्य, समाजकार्य, लेखन इ.

६. सामान्यज्ञान - यात तुमच्या व्यक्तिमत्व गुणाची पारख केली जाते. त्यात नेतृत्व, निर्णय घेण्याची क्षमता, सेवाभाव, कल्पकता, शिस्तप्रेम, तत्परता, प्रामाणिकपणा इत्यादी गोष्टी समाविष्ट होतात.